पालघर : जागतिक लोकसंख्या दिन म्हणून ११ जुलै हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पालघर जिल्ह्यात ११ ते २४ जुलैदरम्यान आरोग्य संस्थांमार्फत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येत आहे. ‘जोडप्यांनी जबाबदारी स्वीकारावी, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करावा’ हे या वर्षासाठीचे घोषवाक्य आहे.
‘वाढती लोकसंख्या हा विकासातील मोठा अडथळा आहे. त्यासाठी कुटुंबनियोजनाचे महत्त्व, लिंग समानता, माता आणि शिशुआरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्याचे हक्क, लैंगिकतेचे शिक्षण, संतती नियमनाच्या साधनांचा आणि निरोधाचा वापर करणे, प्रजननविषयक आरोग्याची माहिती देणे, किशोरवयातील गर्भारपण टाळणे, बालविवाह टाळणे यांसारख्या अनेक विषयांवर जनजागृती करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे मत सुरेखा थेतले यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात मांडले. आरोग्य सभापती सुरेश तरे, आरोग्य समिती सदस्य रंजना संखे, लक्ष्मी ठाकरे, नीता पाटील, चित्रा किणी, सारिका निकम, दामोदर पाटील आणि संतोष गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कुटुंबकल्याण कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान दिलेले अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेअंतर्गत एक किंवा दोन मुलींनंतर नसबंदी किंवा शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जोडप्यांना त्यांच्या मुलींसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सर्वांत जास्त पीपीआययूसीडी बसवून दिलेल्या डॉ. प्रांजल पाटील, वनिता वरठा, डॉ. प्रभाकर सावे, लेप्रोस्कोपी स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया केलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. बहरतकुमार महाले, तसेच सर्वाधिक नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडलेल्या डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले.
२०१६मधील जागतिक लोकसंख्या ७४१.८ कोटी इतकी असून, लोकसंख्यावाढीचा दर १.२ टक्के इतका आहे. देशाची २०१६मधील लोकसंख्या १३२.९ कोटी इतकी असून, दर हजार लोकसंख्येमागे जन्मदर २० व मृत्युदर सात आहे. तसेच लोकसंख्यावाढीचा दर १.३ टक्के इतका आहे. या दराने पुढील अंदाजे ५० वर्षांत भरताची लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याची (वसई विरार महानगरपालिका वगळता) लोकसंख्या सर्वेक्षणानुसार २० लाख (२०,५७,४४९) इतकी असून, जननक्षम जोडप्यांची संख्या चार लाख (४,१७, ३४५) इतकी आहे. प्रती हजार लोकसंख्येमागे हे प्रमाण १५० ते २०० इतके आहे.
सन २०१६-१७मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक अधिनस्त यंत्रणेमार्फत सात हजार ८९९ जणांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात २२१ पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सन २०१६-१७मध्ये सहा हजार २०७ महिलांना कॉपर टी बसविण्यात आली.